भारतीय संघाचा नुकताच वेस्ट इंडीज दौरा संपला आहे. या दौऱ्यात भारतीय संघाने वेस्ट इंडीजवर पूर्णपणे वर्चस्व ठेवताना टी20, वनडे आणि कसोटी मालिकेत विजय मिळवला आहे. पण या दौऱ्यातील दोन्ही कसोटी सामन्यात भारताच्या अंतिम 11 जणांच्या संघात फिरकीपटू आर अश्विनला संधी न मिळाल्याने बरीच चर्चा झाली.

अश्विनने वेस्ट इंडीज विरुद्ध आत्तापर्यंत 11 कसोटीत 60 विकेट्स घेतले आहेत. तसेच चार शतकेही केली आहेत. त्याची ही कामगिरी चांगली असतानाही त्याला 2019 च्या वेस्ट इंडीज दौऱ्यातील कसोटी सामन्यांसाठी 11 जणांच्या संघात संधी न मिळाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.

त्याच्याऐवजी भारतीय संघात अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजाला पसंती मिळाली. यामागील कारण भारताचा कर्णधार विराट कोहलीने स्पष्ट केले आहे.

विराट म्हणाला, ‘जडेजाच्या मदतीने आम्ही नियंत्रण राखू शकत होतो. तो परदेशातील सामन्यांमध्ये सातत्यपूर्ण आणि अचूक गोलंदाजी करणारा गोलंदाज आहे. त्याचमुळे तो 11 जणांच्या संघात सातत्याने राहत आहे.’

‘जरी खेळपट्टी मदत करणारी नसली तरी तो तूम्हाला सामन्यात नियंत्रण राखून देतो. जडेजा नेहमीच कोणत्याही परिस्थितीत चांगला खेळतो आणि त्याचा हाच यूएसपी आहे.’

तसेच विराट जडेजाला संधी देण्यामागील कारण सांगताना म्हणाला, ‘क्रिकेटच्या फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीन्ही क्षेत्रात त्याच्यापेक्षा कोणीही सर्वोत्तम नाही. तो सध्या चांगल्या लयीत आहे आणि संघासाठी योगदान देण्यास इच्छूक आहे. त्याला गोलंदाजी करायची आहे आणि नेहमी खेळत राहयचे आहे.’

जडेजाने या वेस्ट इंडीज दौऱ्यात कसोटीमध्ये 4 डावात 6 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने 3 डावात 75 धावा केल्या. यात त्याच्या एका अर्धशतकाचा समावेश आहे.


Find out more: