भारतीय संघाने बांगलादेशचा अवघ्या ५ धावांनी धूळ चारत १९ वर्षांखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धामध्ये सातव्यांदा विजय मिळवत आशिया चषकावर नाव कोरले आहे. भारतीय संघाने अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता .मात्र सुवेश पारकर ( ४ ), अर्जुन आझाद ( ० ) आणि तिलक वर्मा ( २ ) हे आघाडीचे तीन फलंदाज अवघ्या 8 धावांत माघारी परतले.

त्यानंतर कर्णधार ध्रुव जुरेल ( ३३ ) आणि शास्वत रावत ( १९ ) यांनी काही काळ संघर्ष केला. मात्र ते बाद झाल्यानंतर भारतीय संघ पुन्हा एकदा कोलमडला. करण लाल ( ३७ ) याने अखेरच्या काही षटकांत फटकेबाजी करताना संघाला शतकी पल्ला पार करून दिला. भारताचा संपूर्ण संघ ३२ .४ षटकांत १०६ धावांत तंबूत परतला. बांगलादेशच्या मृत्यूंजय चौधरी ( ३ /१८ ) आणि शमीम होसैन ( 3/८ ) यांनी टीम इंडियाचे कंबरडे मोडले.

भारताचा डाव १०६ धावांत गुंडाळल्यानंतर बांगलादेश सहज विजय मिळवून आशिया चषक नावावर करेल असा अंदाज होता. पण, भारतीय गोलंदाजांनी सुरेख कामगिरी बजावत बांगलादेशची कोंडी केली. भारताच्या गोलंदाजांनी बांगलादेशच्या सहा फलंदाजांना दुहेरी आकडा गाठू दिला नाही.

पण, बांगलादेशने जिद्द सोडली नाही आणि अखेरपर्यंत खिंड लढवली. मात्र, अवघ्या ५ धावांनी त्यांना जेतेपदानं हुलकावणी दिली. भारतानं हा सामना जिंकून सातव्यांदा आशिया चषकावर नाव कोरले. मुंबईकर अथर्व अंकोलेकरने २८ धावांत पाच विकेट्स घेतल्या.

भारताकडून आकाश सिंग आणि अथर्व अंकोलेकर यांनी बांगलादेशच्या फलंदाजांना झटपट माघारी पाठवले. बांगलादेशचे चार फलंदाज १६ धावांत माघारी परतले.कर्णधार अकबर अलीनं चिवट खेळ करताना ही पडझड रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु अथर्वनं त्याला बाद करत भारताच्या विजयाच्या आशा कायम राखल्या.

बांगलादेशचे सहा फलंदाज दुहेरी आकडा न गाठताच माघारी परतले. त्यापैकी दोन फलंदाजांना तर भोपळाची फोडता आला नाही. गोलंदाजीत कमाल करणाऱ्या बांगलादेशच्या मृत्यूंजय चौधरीनं फलंदाजीतही बहुमुल्य योगदान दिले. त्यानं २१ धावा केल्या.

दरम्यान बांगलादेशची अवस्था ८ बाद ७८ असताना भारताचा विजय पक्का समजला जात होता. पण, तनझीब हसन सकीब व रकिबुल हसन यांनी कडवा संघर्ष केला. या दोघांनी २३ धावांची भागीदारी केली. पण, त्यांनाही अपयश आले. बांगलादेशला १०१ धावावर सर्व बाद करत भारतीय संघाने ५ धावांनी विजय मिळवत आशिया चषकावर नाव कोरले आहे .


Find out more: