माजी अर्थमंत्री आणि राज्यसभेचे खासदार अरुण जेटली यांचे शनिवारी (ता. २४)  दीर्घ आजाराने दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झाले. जेटलींच्या जाण्याने भाजप पक्षावर शोककळा पसरली आहे. याचबरोबर विरोधी पक्षाचे आणि कायदा क्षेत्रातील जेटली यांचे निकटवर्तीय त्यांच्या मृत्यूमुळे दु: खी झाले आहेत. तीन देशांचा नियोजित दौरा करत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेटली यांच्या कुटुंबीयांशी फोनवर संपर्क साधून जेटलींच्या निधनावर दु:ख व्यक्त केले. 

दरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, आरोग्यमंत्री हर्षवर्धन, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी, कॉंग्रेसचे खासदार शशी थरूर, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि विविध पक्ष आणि राजकीय व्यक्तींनी त्यांच्या जाण्यावर शोक व्यक्त केला आहे.  

‘अरुण जेटली यांच्या निधनामुळे झालेल्या नुकसानीचे शब्दात वर्णन करता येणार नाही,’ अशा भावना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. 

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्वीटवरून, 'माझे मित्र आणि एक अनमोल सहकारी अरुण जेटली यांच्या निधनामुळे मी खूप दु:खी झालो आहे. व्यवसायाने ते एक उत्कृष्ट वकील आणि कुशल राजकारणी होते.’

कॉंग्रेसने जेटली यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करत एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. 'माजी अर्थ मंत्री अरुण जेटली यांच्या निधनाने आम्हाला अतिशय दुःख झाले आहे. आम्ही त्याच्या कुटूंबियांच्या दु:खात सामिल आहोत. या दु: खाच्या घटनेत आम्ही त्याच्याबरोबर उभे राहून त्याच्यासाठी प्रार्थना करतो.

अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी शोक व्यक्त करताना लिहिले की, 'अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलेले योगदान देश नेहमीच लक्षात ठेवेल. जनशक्ती पार्टी आणि माझ्या परिवाराच्या वतीने मी त्यांच्या कुटुंबातील लोकांबद्दल शोक व्यक्त करतो. त्यांच्या आत्म्यास शांतीसाठी देवाला प्रार्थना करतो. आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ते म्हणतात, 'अरूणजींच्या भाषणात आणि व्यवहारात सौम्यता असायची. त्यांच्या वागण्यात कृतज्ञता होती. जेटली यांच्या नकारातसुद्धा मजबूत संघर्ष दिसून यायचा. ते नेहमीच आमच्या हृदयात रहतील.’ ते पुढे म्हणाले की, ‘त्यांना साश्रूपूर्ण नमस्कार. दिल्ली असो वा मध्यवर्ती राजकारण, एखाद्या मोठ्या भावाप्रमाणे तुम्ही नेहमीच मला मार्गदर्शन केले. देशाने आज एक आदर्श नेता गमावला.’

आंध्र प्रदेशचे सीएम जगन मोहन रेड्डी यांनी ट्विट करत, अरुण जेटली यांच्या निधनाने मला दु: ख झाले आहे. आपल्या दशकाच्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी देशसेवेसाठी उल्लेखनीय योगदान दिले.

पश्चिम बंगालच्या सीएम ममता बॅनर्जी यांनी लिहिले की, अरुण जेटली यांच्या निधनाच्या बातमीने मला फार वाईट वाटले. एक उत्कृष्ट संसदपटू, एक सुज्ञ वकील गमावला भारतीय राजकारणातील त्यांचे योगदान लक्षात ठेवण्याजोगे आहे.

जेटली यांच्यासमवेत तिरुअनंतपुरमचे खासदार आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते शशी थरूर यांनी आपले छायाचित्र शेअर करत ते म्हणाले, 'दिल्ली विद्यापीठात माझे ज्येष्ठ मित्र अरुण जेटली यांच्या निधनानंतर मला फार दुःख झाले आहे. आमची पहिली भेट डूसू येथे झाली आणि मी सेंट स्टीफन कॉलेज युनियनचे अध्यक्ष होतो. राजकीय मतभेद असूनही आमचे मैत्रिपुर्ण संबंध होते.'

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांना श्रद्धांजली वाहताना लिहिले की, 'हे देशाचे मोठे नुकसान आहे. या घटनेत मी त्याच्या परिवारासाठी प्रार्थना करतो.

मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात त्यांची सहकारी उमा भारती यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत लिहिले.  अरुण जेटली यांचे निधन माझे वैयक्तिक नुकसान आहे.  माझा मोठा भाउ मला सोडुन गेला आहे. या दु: खद घटनेत मी त्याच्या कुटुंबियांसमवेत आहे. '

माजी वाणिज्यमंत्री आणि जेटली यांचे मित्र सुरेश प्रभू यांनी लिहिले की, माझा प्रिय मित्र, जलद विचारांचा, उत्कृष्ट रणनीतिकार, ज्येष्ठ राजकारणी, माझे सहकारी अरुण जेटली यांचे निधन झाल्याची बातमी ऐकून मला फार वाईट वाटले.'

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी लिहिले की, 'माजी अर्थमंत्री आणि ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांच्या निधनाने मला फार आश्चर्यकारक धक्का बसला. मी त्यांना बर्‍याच वर्षांपासून ओळखतो. ते महान ज्ञान परिपूर्ण व्यक्ती असल्याचे आढळले. आम्हाला त्यांची नेहमीच आठवण येईल.

दिल्लीच्या एम्समध्ये दुपारी १२च्या सुमारास जेटलींनी अखेरचा श्वास घेतला. ते 66 वर्षांचे होते. जेटली 9 ऑगस्टपासून एम्समध्ये दाखल होते. श्वास घेण्यास अडचण येत असल्यामुळे त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले. जेटली यांच्या मृत्यूची बातमी समजताच गृहमंत्री अमित शहा यांनी हैदराबाद दौरा रद्द केला आहे. अरुण जेटली यांच्या मृत्यूची बातमी समजताच उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी चेन्नई ते नेल्लोरचा प्रवास थांबवुन ते दिल्लीला परतत आहेत.




Find out more: