शिस्त, तत्त्व, संस्कार, नीतिमत्ता व साधनशुचिता या पंचसूत्रीवर भाजपचा डोलारा उभा आहे. त्यामुळे शिट्ट्या मारणं, कॉलर उडवणे हे असले प्रकार भाजपच्या शिस्तीत बसत नाही. शरद पवारांनी हे खपवून घेतले हा त्यांचा बेशिस्तपणा अशा शब्दात राष्ट्रवादीतून नुकत्याच भाजपत आलेल्या उदयनराजे भोसले यांची सामनाच्या अग्रलेखातून  कानउघडणी करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजप अध्यक्ष अमित शाह व्यासपीठावर असताना शिट्ट्या मारणं, कॉलर उडवणे हे असले प्रकार भाजपच्या शिस्तीत बसत नाही. शरद पवारांनी हे खपवून घेतले हा त्यांचा बेशिस्तपणा. पण याची कल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सातारच्या राजांना एव्हाना दिली असेल. येथे हायकमांड आहे आणि ते दिल्लीत आहे अशी समजही सामनाच्या अग्रलेखातून उदयनराजेंना देण्यात आली आहे.

थोरल्या छत्रपतींनी दिल्लीतील तेव्हाच्या हायकमांडला जुमानले नव्हते. उदयनराजेंनी दिल्लीत जाऊन हायकमांडच्या आशीर्वादाने भाजपचा रस्ता पकडला. भाजपात प्रवेश घेताना त्यांनी कॉलरही उडवली नाही. त्यामुळे राजांना शिस्तीचे वळण लागत आहे, अभिनंदन! असेही सामनाच्या अग्रलेखातुन म्हटलं आहे.

साताऱ्याचे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांची साथ सोडून भाजपचा मार्ग स्वीकारला आहे. आयाराम-गयारामांचा मुसळधार मोसम सध्या सुरूच आहे. पाऊस थांबत नाही तसा हा मोसमही थांबत नाही. इतर सर्व मंडळी महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश घेत असतात, पण उदयनराजे हे शिवरायांच्या सातारच्या गादीचे तेरावे वंशज असल्याने त्यांचा प्रवेश अमित शहा यांच्या दिल्लीतील बंगल्याच्या हिरवळीवर झाला आहे. उदयनराजे हे शिवरायांचे 13 वे वंशज आहेत म्हणून समाजात त्यांना मान आहे, पण असे शिवरायांचे थेट वंशज कोल्हापूरच्या गादीचे संभाजी छत्रपतीदेखील आहेत. महाराष्ट्रातील विविध सामाजिक उपक्रमात कोल्हापूरचे छत्रपती आघाडीवर असतात.

संभाजी छत्रपती हे राज्यसभेत आहेत व भाजपने त्यांना नेमले आहे. भाजपने भागाभागातील सरदार, संस्थानिकांच्या वंशकुळातील लोक आधीच घेतले आणि आता थेट सातारच्या राजांनाच प्रवेश देऊन ‘स्व-राज्य’ आणण्याच्या दिशेने पाऊल टाकले. साताऱ्याचे राजे युती परिवारात आले याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडंच. अशाप्रकारे उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाच्या निर्णयाचे कोडकौतुक केलं आहे.




Find out more: