आपल्यावर अन्याय होतो आहे, हे उदयनराजेंना आधी कळले नाही का, असा प्रश्‍न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित केला आहे. त्यांना समज यायला 15 वर्षे लागली, अशा उपरोधिक शब्दांत पवार यांनी उदयनराजे यांच्यावर टीका केली.नाशिकमध्ये पवार यांची पत्रकार परिषद झाली. या वेळी पवार यांनी उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशावर टीका केली.

पवार नाशिकमध्ये आणि छगन भुजबळ मुंबईत होते, त्यावरही काही उलटसुलट चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या; मात्र त्यावर प्रश्‍न विचारला असता, आजचा कार्यक्रम भुजबळ यांनीच आखून दिला आहे, असे उत्तर पवार यांनी दिले. येत्या आठवड्यात निवडणूक जाहीर होईल, दिवाळीच्या आत राज्यात निवडणूक होईल असे त्यांनी सांगितले.

या वेळी नव्या चेहर्‍यांना संधी देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी 125 जागांवर लढणार आहे. मित्रपक्षांना 38 जागा देण्यात येणार आहेत, असे पवार यांनी सांगितले.रविवारी नवी मुंबईतही शरद पवार यांनी उदयनराजेंवर निशाणा साधला होता.

महाराज स्वतःच्या स्वार्थासाठी दिल्लीश्‍वरांचे अधीन झाले नव्हते. त्यांनी मावळ्यांमध्ये स्वाभिमान निर्माण करून रयतेचे राज्य निर्माण केले. कुणाच्याही जाण्याने महाराष्ट्रात काही फरक पडणार नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून, अठरापगड जातीच्या मावळ्यांमधून पुन्हा नवा महाराष्ट्र घडवू, असे पवार यांनी म्हटले होते. नाशिकमध्ये पुन्हा एकदा पवार यांनी उदयनराजे यांच्यावर टीका केली.

Find out more: