अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. अजित पवारांच्या राजीनाम्याबाबत पवार काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष होतं.

लढाई सोडण्याचा अजित पवारांचा स्वभाव नाही, माझ्यावर कारवाई झाली म्हणूनच त्यांनी राजीनामा दिला, असं  शरद पवार म्हणाले. कधीही नोटीस न आलेल्या काकांनाही (शरद पवारांना) नोटीस, त्यामुळे राजकारणात न आलेलं बरं, राजकारणाऐवजी व्यवसाय केलेला बरा, असा सल्ला अजित पवारांनी मुलाला सल्ला दिला, असं पवार म्हणाले.

मी कुटुंबप्रमुख म्हणून सांगतो, पवार कुटुंबात किंचितही वाद नाही, कुटुंब प्रमुखाचा शब्द महत्त्वाचा असतो, असं  शरद पवारांनी ठणकावून सांगितलं.

पवार म्हणाले, “आज राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक मुंबईत झाली. ईडीची मला आलेली नोटीस, त्याबाबत सहकाऱ्यांची झालेली प्रतिक्रिया आणि यासंदर्भात पुढील भूमिका याबाबत चर्चा झाली. 24 तारखेला मी जाहीर केलं होतं, पुढील 3-4 आठवडे महाराष्ट्रातील निवडणुकांमुळे राज्यभर जावं लागेल. त्यामुळे ईडीने जो गुन्हा दाखल केला आहे, राज्य सहकारी बँकेबाबतचा.

त्या बँकेत किंवा कुठल्याही बँकेत मी सभासद किंवा संचालक नाही. तरीही असा गुन्हा दाखल झाला आणि त्यात माझंही नाव घेण्यात आलं. याबाबत माझी पुढच्या महिन्यात गैरहजेरी असेल त्यामुळे आज जाण्याचं ठरवलं. मी सूचनाही दिली. पण रात्री ईडीचं मला पत्र आलं. तुम्ही 27 तारखेला येण्याची गरज नाही, आवश्यकता असेल तर पूर्वसूचना देऊ”

तरीही मी जाण्याचं ठरवलं होतं. पण मुंबई पोलीस आयुक्त माझ्याकडे आले आणि मला विनंती करुन न येण्याचं आवाहन केलं. मुंबईत संचारबंदी लागू केली आहे त्यामुळे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करावी, अशी विनंती केली.

त्यानंतर मी सहकाऱ्यांशी चर्चा केली. मुंबईत शेकडो वाहनांनी कार्यकर्ते येत होते, त्यांना ठिकठिकाणी रोखलं होतं. त्याची माहिती मिळाली. पण परिस्थिती चिघळू नये, म्हणून आम्ही एक पाऊल मागे घेतलं.



Find out more: