“छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये फुट पाडणारी अनाजी पंतांसारखी एक प्रवृत्ती होती. आताही तशी प्रवृत्ती या समाजात आहे. त्याच प्रवृत्तीला बळी पडून उदयनराजे भोसले यांनी पक्षातून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला,” असं मत विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलं. असं व्हायला नको होतं, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.

निवडणुकीच्या तोंडावर अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेना भाजपामध्ये प्रवेश केला. यावरही त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. “जे लोक पक्ष सोडून गेले. त्यांना काय असं आमिष दाखवलं गेलं किंवा त्यांच्याकडून काय असं चुकलं यामुळे त्यांनी अन्य पक्षात प्रवेश केला याची कल्पना मला नाही.

कोणत्याही परिस्थितीत ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी गद्दारी केली त्यांना कोणत्याही परिस्थितीत याच मातीत गाढायचं असा पक्षाने आणि महाराष्ट्राच्या जनतेनेही निर्णय केला असल्याचे” मुंडे म्हणाले. एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपलं मत व्यक्त केलं.

दरम्यान, यावेळी त्यांनी आपल्या परळी मतदारसंघाबाबतही भाष्य केलं. “लोकांना आता विकासाचं राजकारण हवं आहे. या मतदारसंघात विकास झाला नाही. मतातून निवडून आलेलं नेतृत्व निष्क्रिय आहे ही भावना जनतेतून दिसत असल्याचंही ते म्हणाले.

गोपीनाथ मुंडे यांच्या संघर्षाचा, विचारांचा वारसरदार, तसंच त्यांचा या मातीप्रती जी स्वप्न होती ती पूर्ण करणारा वारसदार आता नक्कीतच ठरणार आहे,” ते म्हणाले.


Find out more: