
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका वृत्तवहिनीला दिलेल्या मुलाखतीत बाळासाहेब ठाकरे यांच्या इतके संदर्भात मोठा खुलासा केला आहे. वरिष्ठांच्या हट्टापायी बाळासाहेबांना अटक करण्यात आल्यांचं अजित पवारांनी सांगितले आहे. त्यानंतर अजित पवारांचा हा इशारा छगन भुजबळांकडे होता का ? असा प्रश्न भुजबळांना विचारण्यात आला आहे.
या प्रश्नावर बोलताना, त्यावेळी माझा नाईलाज होता, म्हणून मी त्या फाईलवर सही केली, असे भुजबळांनी म्हटलं आहे.दरम्यान बाळासाहेबांना अटक ही राष्ट्रवादीची चूक होती. त्या काळामध्ये आमचंही स्वतःचं मत होतं. इतक्या टोकाचं राजकारण कोणी करू नये, त्यावेळी आमच्या मताला एवढी किंमत नव्हती.
काही जणांच्या हट्टापायी तसं करण्यात आलं, असे अजित पवारांनी सांगितले होते. त्यावर, राष्ट्रवादीने नेते आणि तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ यांनी उत्तर देताना, आता तो विषय संपल्याचं म्हटलं आहे.
पुढे बोलताना भुजबळ म्हणाले की, 1999 मध्ये ज्यावेळी आम्ही पक्षाच्या प्रचारासाठी उतरलो, त्यावेळी आमच्या वचननाम्यातच श्रीकृष्ण आयोगाने ज्या लोकांना दोषी ठरवले त्यांच्यावर योग्य ती कारवाई करू असं होतं. 1995 मध्ये जेव्हा युतीचं सरकार होते, त्यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांविरुद्ध असलेल्या खटल्यांचा निपटारा करण्यात आला होता.
परंतु, श्रीकृष्ण आयोगाची फाईल तशीच ठेवण्यात आली होती. ती फाईल माझ्यासमोर आली तेव्हा मी गृहमंत्री होतो. तेव्हा इकडे आड तिकडे विहीर अशी स्थिती माझी होती. त्यामुळे मला नाईलाजाने सही करावी लागली. मात्र, हा मुद्दा आता संपल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केल आहे.