![](https://www.indiaherald.com/cdn-cgi/image/width=750/imagestore/images/politics/politics_latestnews/delhi-violence-is-a-failure-of-the-home-ministry-rajinikanth05eb7bd2-c02b-4c8c-b368-89d3cf61176a-415x250.jpg)
मुंबई : सुधारित नागरिकत्व कायद्या (सीएए) वरून दिल्लीत तीन दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसक आंदोलनातील मृतांचा आकडा २० वर पोहचला आहे. ईशान्य दिल्लीतील विविध भागांमध्ये मंगळवारी दिवसभर बेफाम दंगलखोरांनी पोलिसांना न जुमानता चौकाचौकांमध्ये सशस्त्र हिंसाचार माजवला. या परिसरात अराजकतेने थैमान घातलेले पाहायला मिळाले. हिंसाचारप्रकरणी ११ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याच पार्श्वभूमीवर अभिनेते रजनीकांत यांनी केंद्र सरकारवर म्हणजेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर निशाणा साधला आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, ‘दिल्लीतील हिंसाचार गुप्तचर विभाग अर्थात गृहमंत्रालयाचे अपयश आहे, अशी टीका रजनीकांत यांनी केली आहे. तसेच दिल्लीकर नागरिकांनाही संयमाचे आवाहन केले आहे.
‘दिल्ली हिंसाचार हा गुप्तचर विभाग अर्थात केंद्रीय गृहमंत्रालयाचे अपयश आहे. एखाद्या गोष्टीचा निषेध हा शांततेतही करता येतो. त्यासाठी हिंसा करण्याची गरज नाही. आणि तरीही हिंसाचार झाल्यास तो कठोरपणे निपटून काढला पाहिजे,’ असे रजनीकांत याबाबत बोलताना म्हणाले.
दरम्यान, मोदी पाहुण्यांसोबत आहेत आणि दुसरीकडे हिंसाचार सुरू आहे, अशा आशयाचं ट्विट लेखक चेतन भगत यांनी केलं आहे. दिल्लीतील हिंसाचारावर याआधी लेखक चेतन भगत यांनीही केंद्र सरकावर टीका केली आहे.