
मुंबई : केंद्र सरकारने काल लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा केली असली तरी काही शिथिलता या लॉकडाऊनमध्ये देण्यात आली आहे. काही प्रमाणात प्रवासाची परवानगीदेखील यामध्ये देण्यात आली आहे.
पण याबाबत अनेकांना काही संभ्रम आणि गैरसमज आहेत. पण मुंबई आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रांतून दुसरीकडे जाऊ इच्छिणाऱ्या वा या क्षेत्रातील शहरात येऊ पाहणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची माहिती आहे.
आंतरराज्य किंवा आंतरजिल्हा प्रवासाची परवानगी देण्याचे अधिकार पोलीस आयुक्तालय असलेल्या शहरामध्ये (उदा. औरंगाबाद, नाशिक, अमरावती, सोलापूर नागपूर आदी) संबंधित विभागाच्या पोलिस उपायुक्तांना आहेत. असे अधिकार पोलीस आयुक्तांना असले तरीही मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रामधील नागरिकांना महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात जाण्यास अथवा त्या जिल्ह्यातून या प्राधिकरण क्षेत्रात येण्यास परवानगी नाही.
महाराष्ट्राबाहेर (विशेषत: कामगार, मजुरांना) या दोन्ही प्राधिकरण क्षेत्रातून जाण्याची परवानगी आहे. जवळच्या पोलीस ठाण्यात अशा परवानगीसाठी संपूर्ण माहितीसह मेडिकल प्रमाणपत्रासह अर्ज करता येईल. सर्व पोलीस ठाण्याची माहिती एकत्र करून त्या विभागांच्या पोलीस उपआयुक्तांकडे पाठवली जाईल.
अर्जाची छाननी करुन नियमानुसार आणि तेथील कोरोना प्रादुर्भाव परिस्थितीचा विचार करून पुढील कार्यवाही केली जाणार आहे. त्यामुळे अर्धवट किंवा अनधिकृत किंवा ऐकीव माहितीवर विश्वास ठेवू नये आणि कोणीही कुठेही धावाधाव करू नये. राज्य शासनाच्या सर्व निर्देशांचे पालन करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.